एकल महिलांच्या वारस नोंदीसाठी विशेष अभियान; श्रीरामपूर मिशन वात्सल्य समिती बैठकीत निर्णय


श्रीरामपूर : पतीच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तांना कोरोना एकल महिलांची वारस नोंद लावण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मंगळवारी सायंकाळी ही बैठक झाली. संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार चारूशिला मगरे-सोनवणे, सहायक गटविकास अधिकारी उस्मान शेख, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजश्री देशमुख, अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, श्रीरामपूर नगरपालिकेचे समुदाय संघटक  हरिष पैठणे,तालुका उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे शिरस्तेदार अण्णासाहेब चिंधे यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.

प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव शोभा शिंदे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. तसेच तालुक्यातील एकल महिलांसाठी ३० मे रोजी आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचा २१२ महिलांनी लाभ घेतला. यात ३३ महिलांनी घरकुलासाठी, तर ३५ महिलांनी संजय गांधी योजनेसाठी, १६ महिलांनी बालसंगोपन योजनेसाठी अर्ज केले होते. महिलांचे प्राप्त अर्ज कार्यवाहीसाठी  संबंधित विभागांकडे पाठविले होते, असे शोभा शिंदे यांनी सांगितले. या शिबिरात आलेले सर्व अर्ज निकाली काढल्याचे नायब तहसीलदार मगरे-सोनवणे यांनी सांगितले. बालसंगोपन योजनेचे अर्ज आता पंचायत समिती कार्यालयात स्वीकारले जात असल्याने पालकांना अर्ज जमा करण्यासाठी नगरला जावे लागणार नाही, असे भिसे यांनी सांगितले. बचत गटांना बँका सहकार्य करीत नसल्याची तक्रार पैठणे यांनी केली.

कोरोना एकल महिलांना पतीच्या निधनानंतर वारस नोंदी लावण्यात अडचणी येतात. त्यामुळे महसूल विभागाने पुढाकार घेऊन यासाठी विशेष अभियान राबविण्याची सूचना मिलिंदकुमार साळवे यांनी केली. त्यानुसार तलाठ्यांना सूचना देऊन अभियान राबविले जाईल, असे निवासी नायब तहसीलदार वाकचौरे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या सततच्या कामामुळे मी अनेकदा मंत्र्यांच्या बैठकीलाही हजर राहू शकत नाही. त्यामुळे आमचे प्रतिनिधी बैठकांना येतात. पण समितीच्या बैठकीतील माझ्या अनुपस्थितीबाबत पेपरला बातम्या येतात, असा संताप तालुका आरोग्याधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.  नव्या शासन निर्णयानुसार मुले २५ वर्षांची झाली तरी गरजू महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा, अशी सूचना बाळासाहेब जपे यांनी केली. या बैठकीस समितीचे सदस्य असलेले प्रमुख अधिकारी गैरहजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष तथा निवासी नायब तहसीलदार वाकचौरे यांनी दिले.

महिलेस पावसाळ्यातही निवारा नशिबी नाही...

उंबरगाव येथील कोरोना एकल महिला कविता अशोक परभणे यांच्या मंजूर घरकुलाचा हप्ता एका  महिलेच्या तक्रारीवरून पंचायत समितीने रोखून धरला आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे सुनावणीदेखील झाली. पण महिनाभरानंतरही याचा निकाल न दिल्याने या महिलेस पावसाळ्यातही निवारा मिळू शकलेला नाही, याकडे साळवे यांनी समिती अध्यक्षांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी सहायक गटविकास अधिकारी शेख यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post