श्रीरामपूर - वैजापूरला जोडणारा ( राजमार्ग ५१ ) नाऊर -उंदिरगाव या रस्त्यावर चक्क माती मिश्रीत मुरूम टाकुन केले जातेय काम; चौकशीची मागणी


नाऊर ( संदिप जगताप ) : श्रीरामपूर व वैजापूर या दोन्ही तालुक्यांना अगदी जवळून जोडणारा तसेच प्रवरासंगमच्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी करण्याच्या उदात्त हेतूने श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व तत्कालिन मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांच्या अथक प्रयत्नातुन शासनाच्या तरतुदीतुन नाऊर येथील गोदावरी नदीवर कोट्यावधी रुपये खर्च करून पुलासह रस्त्याची निर्मिती करण्यात आली. पूर्वीचा राजमार्ग ४७ व नव्याने राज्यमार्ग 51 या रस्त्यांचे काम काही महिन्यापूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. लहु कानडे यांच्या पाठपुराव्यातुन हरेगाव फाटा ते उंदिरगाव या १० कि.मी. रस्त्याचे काम करण्यात आले होते, त्यापुढील उंदिरगाव - नाऊर या ४ कि.मी. रस्ताचे काम नुकतेच सुरु करण्यात आले असुन या रस्त्यावर मुरुमाऐवजी चक्क माती मिश्रीत मुरुम टाकला जात असुन संबधित विभागाच्या अधिकारी यांची डोळेझाक होत असल्याने या रस्त्याचे पुढील भविष्य अंधकारमय असुन या रस्त्याची क्वालिटी कंट्रोल कडून चौकशी करण्याची मागणी रामपूरचे माजी सरपंच सुरेश भडांगे यांनी केली आहे.

नगर व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांना जवळून जोडण्याच्या व श्रीरामपूर - वैजापूर या दोन्ही तालुक्यांची बाजारपेठेसह रस्त्यावरील ग्रामीण भाग विकसित होण्याच्या दृष्टीने आणि नगर - छ. संभाजीनगर रस्त्यावरील प्रवरासंगमच्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी करण्याच्या उदात्त हेतुने निर्माण करण्यात आलेल्या नगर - शिऊर या राज्यमार्ग 51 ची निर्मिती करण्यात आली. भूसंपादनाच्या कायदेशीर प्रक्रियेमुळे तसेच शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने कोट्यावधीचा पुल होऊन देखील हा रस्ता अनेक वर्ष होऊ शकला नाही.मात्र दैनिक सार्वमतच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे काही अधिकारी तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम करण्यात आले. त्यापुढील काळात या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली.वैजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर नेहमीच खड्डे पडत राहिले तसेच वैजापूर भागातुन चालणाऱ्या अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांचे तीन - तेरा वाजले.

श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत नुकतेच चार किलोमीटर कामासाठी शासनाच्या तिजोरीतून साडेपाच कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून या रस्त्यावर मुरमाऐवजी चक्क माती मिश्रित मुरूम टाकला जात असून गवळा खडीचा देखील वापर करण्यात येत आहे.यासंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी डोळे झाक करत असल्याने ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमधून होत असुन या रस्त्याची कॉलिटी कंट्रोल विभाग नाशिक कडून तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी रामपूरचे माजी सरपंच सुरेश भडांगे यांनी केले आहे.

वैजापूर तालुक्यातून श्रीरामपूर तसेच राहाता बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा शेतमाल येत असतो तसेच याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रेलचेल सुरू असून या रस्त्यावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते. राजमार्ग असलेल्या या रस्त्याचे काम अशा ठेकेदारी पद्धतीने केल्यास हा रस्ता टिकणार का ? अशी शंका उपस्थित केली जात असुन कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आले नसुन या कामाची सखोल चौकशी होण्याची मागणी परिसरातील नागरिकातुन करण्यात येत आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post