साईकिरण टाइम्स | २५ नोव्हेंबर २०२०
श्रीरामपुर ( अहमदनगर ) राज्यातील काही उतावळ्या मंत्र्यांनी मोठ्या तोऱ्यात '५० टक्के वीज बिल माफ करु' अशी घोषणा केली होती; महाराष्टातील 'तीन तोंडी सरकारने' ५० टक्के वीजबिल माफी तर नाही, पण ग्राहकांना वाढीव वीजबिले देऊन, वीजबिल न भरल्यास, वीज जोडणी कट करण्याची भाषा केल्याने 'सिटीझन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र' या पत्रकार संघ व विविध पक्षांच्यावतीने नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील स्मशानभूमीत बुधवारी (दि.२५) राज्यातील 'तीन तोंडी सरकारच्या घोषणे'चे श्राद्ध घालून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची जिल्ह्यासह राज्यभर चर्चा होत आहे.
श्राद्धा पत्रिकेची चर्चा
आंदोलनकर्त्यांनी श्राद्धाची वैशिष्ट्यपूर्ण पत्रिका तयार केली होती; ज्यात कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की, राज्य सरकारच्या सुंदर 'घोषणे'चा अपघाती मृत्यु झाला असून, घोषणा मेल्याने उभा महाराष्ट्र हळहळत आहे, हे दुःख व्यक्त करण्यासाठी सर्व पक्षीय भावपूर्ण श्रध्दांजलीं वाहण्यात आली, तसेच माय बाप सरकार तीन तोंडांचे (पक्षांचे) कोणत्या तोंडाकडे पहावे ? असा सवाल देखील आंदोलकांनी उपस्थित केला.
आंदोलना दरम्यान हिंदु प्रथेप्रमाणे पुरोहित राजेंद्र जोशी यांनी श्राद्ध पूजा केली. लॉकडाऊनमुळे शेतकरी, छोटे व्यावसायिक, व्यापारी, संघटित - असंघटित कामगार, मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार असे सर्वच जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा बिकट परिस्थितीत शासनाकडून मदत मिळण्या ऐवजी फसवी घोषणा केल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
या आंदोलनास सिटीझन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष कामगार नेते नागेशभाई सावंत, राज्य सरचिटणीस राजेंद्र नारायणे, आप चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, शेतकरी संघटनेचे अहमदभाई जाहिगिरदार, वंचीत आघाडी चे चरण त्रिभुवन, डॉक्टर मुठे, आपचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जोएब जमादार, आशिष परदेशी, बी.एम पवार, भारत जाधव, दानिश शाह, विष्णु भागवत, राजू यादव,आशिष परदेशी,दीपक परदेशी, राहुल रणपिसे, राहुल केदार,किरण गायकवाड, संदेश आजगे, तसेच भरती शिंदे, अंबिका प्रधान,मंदा कसबे,ज्योती राठोड,कुसुम पवार, सिंधू बनकर, लता माळी, शोभा पवार आदी महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते.