साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 सप्टेंबर 2020
भगतसिंगचा लढा साम्राज्यशाही विरोधात तर होताच शिवाय तो देशातील सरंजामदारी, जातियवादाच्या विरोधात देखील होता. तो भारतीयांच्या समतेसाठी, भयमुक्त व सन्मानपुर्ण जीवनाच्या निर्मीतीसाठी होता. त्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांती केली. वैज्ञानिक विचारधारा असलेले भगतसिंग यांच्या विचारातील स्वातंत्र्य आजही मिळालेले नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड श्रीकृष्ण बडाख यांनी केले.
क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने श्रीरामपूर येथे शहीद भगतसिंग यांना अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात केली होती. सभेला संबोधताना कॉ. बडाख बोलत होते.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाश सावंत, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे, भानुदास धनवटे, भाऊसाहेब धोत्रे, संतोष त्रिभुवन यांनी क्रांतिवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन केले. यावेळी परिसरातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
कॉ. बडाख म्हणाले, पारतंत्र्यात असताना मार्क्सच्या विचारांवर निष्ठा असलेला क्रांतिवीर, देशप्रेमी, युवक भगतसिंग यांनी देश स्वातंत्र्यसाठी इंग्रजांनी इथून चालते व्हावे म्हणून सशस्त्र संघर्ष केला. शहीद भगतसिंग यांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य मिळालेले नाही. मागील आणि आत्ताचे सरकारनेही श्रमिक, कामगार, शेतकरी यांचे विरोधी धोरणे घेवून सत्तेच्या गैरवापरातून ठराविक लोकांसाठी भांडवलशाही राजवट आणून यात श्रमिकांची गुलामगीरीकडे वाटचाल करीत आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी वंचितांनी शिक्षित होवून कलमक्रांती घडवून आणण्याची आज मोठी गरज आहे. हीच खरी शहीद भगतसिंग यांना आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले. यावेळी अमोल सोनावणे यांनी क्रांतिकारी गीते सादर केली. आभार भानुदास धनवटे यांनी मानले.