साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धान्य दुकानदारांना स्वतःचा अंगठा प्रमाणित करुनच ग्राहकांना धान्य देण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे.
जिल्हा संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात देसाई यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुलैपर्यंत शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना स्वतःचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याची मुभा दिली होती; त्यावेळी कोरोनाचे रुग्ण काही ठराविक भागातच सापडत होते. परंतु, सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ही साखळी तोडणे गरजेचे आहे. आता शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढलेले आहे, असे असताना शासनाने आँगस्टपासून कार्डधारकांचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याचा आदेश दिलेला आहे; परंतु, सध्या कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कार्डधारकांचे अंगठे घेण्याची दुकानदारांना जास्त भिती वाटत आहे. धान्य घेण्याकरीता दररोज शेकडो ग्राहक दुकानात येत असतात. कार्डधारकाचा अंगठा हातात धरुनच तो पाँज मशीनवर ठेवावा लागतो. त्यामुळे, एखादा बाधीत रुग्ण आला तर दुकानदार बाधीत होईलच. परंतु, त्यानंतर येणारा प्रत्येक व्यक्ती बाधीत होवु शकतो. हा धोका लक्षात घेवून शासनाने पाँज मशीनवर धान्य देताना दुकानदारांचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याची परवानगी देण्यात यावी. अहमदनगर शहरा बरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. अनेक भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत झालेले आहेत. अशा परिसरात दुकान चालू ठेवणे म्हणजे दुकानदारांच्या व सर्व कार्डधारकांच्या जीवाशी खेळण्या सारखे आहे. त्यामुळे शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करुन धान्य दुकानदारांचे अंगठे प्रमाणीत करुन धान्य देण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.