साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 जून 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूरातील नेहरू भाजी मार्केट लॉकडाऊन झाल्यापासून बंद असल्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातील बरेचसे भाजी विक्रेते वयोवृद्ध असून ते फिरून भाजीपाला विक्री करू शकत नसल्याने भाजी मार्केट चालू करावे, अशी मागणी भाजी विक्रते व भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे केली आहे.
नगरपालिकेने सर्व व्यवसायांना परवानगी दिली आहे; परंतु नेहरू भाजी मार्केटला परवानगी दिली नाही. येथेच शहराच्या विविध भागात काही लोक नव्याने भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यांना मात्र रस्त्यावर बसण्यास परवानगी आहे. मात्र, अनेक वर्षापासून मार्केटमध्ये भाजीपाला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असणारे भाजीपाला विक्रेत्यांची मात्र उपासमार होत आहे. याबाबत श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना भाजी मंडई चालू करण्याबाबत भाजपाचे संघटन सरचिटणीस सतीश सौदागर व भाजपा संपर्क अभियानाचे शहर संयोजक विशाल अंभोरे, संजय यादव ,शहर उपाध्यक्ष गणेश परदेशी, महेंद्र शेटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नेहरू भाजी मार्केटमधील भाजीविक्रेते सतीश अहिरे, कैलास महाजन ,ह.वा. बागवान ,सौ. सुशीला तरटे ,सौ प्रभूने बाई ,अंजनाबाई राहिले ,सौ. आढाव सुरेखा लोखंडे, आदी महिला व पुरुष उपस्थित होते.