साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 मे 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) दीड -पावणे दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार व श्रीरामपूर नगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार आज श्रीरामपूरातील बाजारपेठ उघडण्यात आली.
दुकानदारांचा अर्धा दिवस दुकानातील झाडलोट आणि धूळ साफ करण्यातच गेला. शहरात आज खरेदी करणाऱ्यांपेक्षा रस्त्यावर फिरणाऱ्या बघ्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. दारूच्या दुकानांसमोर खरेदीसाठी मद्यपींच्या मोठया रांगा लागल्या होत्या.
या रांगा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत होत्या. नगरपालिकेने निर्माण केलेल्या नियंत्रक पथकात सदस्य संख्या सुद्धा जास्त असल्याने रस्त्यावर त्यांचेच टोळके दिसून येत होते.
व्यापारी असोसिएशनने प्रांत अधिकार्याकडे केलेली मागणी, त्याला जिल्ह्याचे वजनदार मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिलेला पाठिंबा आणि नागरिकांची ताणलेली उत्सुकता या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने मंगळवारी संध्याकाळी उशीरा शहरातील बाजारपेठ उघडण्याचे आदेश जारी केले.
त्यानुसार आज सकाळी मुख्य बाजारपेठेतील सर्व रस्त्यांवर एका बाजूची दुकाने उघडण्यात आली. मेन रोड, शिवाजी रोडवर पश्चिम मुखी तर नेवासा संगमनेर रोडवर दक्षिणमुखी दुकाने सुरू करण्यात आली. सकाळपासूनच दुकानदारांनी आपली दुकाने उघडून थाटण्यास सुरुवात केली. बारा वाजेपर्यंत दुकानातील झाडलोट व स्वच्छता सुरू होती. कारण दीड महिन्यापेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्यामुळे दुकानात सर्वत्र धूळ साचलेली दिसून आली.
रस्त्यावर दुकानात जाणाऱ्या ग्राहकांपेक्षा रस्त्यावर फिरणाऱ्या बघ्यांचीच गर्दी अधिक प्रमाणात होती.
बाजार पेठेतील दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांची सात पथके तयार केली. प्रत्येक पथकामध्ये दहा ते पंधरा लोकांचा समावेश होता. त्यांना नेमून दिलेल्या रस्त्यावर हे सर्व लोक दुकानदारांना व नागरिकांना सूचना देत होते.
नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी समीर शेख, उपमुख्याधिकारी प्रकाश जाधव, सोफिया बागल व त्यांचे सहकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. मुख्याधिकारी शेख स्वतः रस्त्यांवर फिरुन दुकानदारांना काळजी घेण्याचे आवाहन करीत होते. व्यापारी पेठेतील दुकानदारांनी ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था केली होतीम इतर कुठेही रांगा नव्हत्या ; मात्र, दारूच्या दुकानांसमोर खरेदीसाठी मद्यपींच्या मोठया रांगा लागल्या होत्या. या रांगा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
.
रस्ता मोकळा करा.....
शहरातील सर्वत्र रस्ते सुरू करण्यात आलेले असताना श्रीरामपूर शहराला दक्षिणोत्तर जोडणाऱ्या सय्यद बाबा चौकतील धान्य गोडाऊन जवळ बंद केलेला रस्ता मात्र सुरू करण्यात न आल्याने वार्ड नंबर 1,2, गोंधवणी रोड, पंजाबी कॉलनी, मिल्लत नगर या भागातील लोकांना रेल्वे पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून यावे लागत होते. सगळीकडे जर बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे तर हा रस्ता देखील मोकळा करण्यात यावा. संध्याकाळी पाच नंतर सकाळी नऊ पर्यंत तो बंद करण्यात यावा अशी मागणी दोन्ही बाजूकडील नागरिकांनी केली आहे.
Good verification
ReplyDelete