साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 मे 2020
श्रीरामपूर | सध्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे त्यापार्श्वभूमीवर सगळयाच यंत्रणा जागरुक होऊन दक्षता घेतांना दिसत आहे. मात्र श्रीरामपूर नगरपरिषद त्याला अपवाद असून पालिकेचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले आहे.
याबाबत असे की, सध्या कोरोना आजारांमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट झाले असतांना श्रीरामपूर नगरपरिषदेची रुग्णवाहिका गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे.
श्रीरामपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांना याचा प्रत्यय आला आहे. रुग्णवाहिका म्हणजे अत्यावश्यक सेवा आणि आताच्या या संकटाच्या काळातच पालिकेची रुग्णवाहिका गेल्या काही दिवसांपासून ना दुरुस्त असल्याने नगरपरिषद प्रशासन गंभीर नसल्याचे पून्हा एकदा दिसून आले आहे.
दोन ते तीन दिवसांपासून शहरातील वेग वेगळे नागरिक नगरपरिषदेच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधत आहे परंतु वाहन विभागातील कर्मचारी नागरिकांना रुग्णवाहिका ना दुरुस्त असल्याचे सांगत आहे आणि त्याचा प्रत्यय छल्लारे यांना आला आहे.
याबाबत अधिक विचारपूस केली असता असे सांगण्यात आले की, वेळेवर सर्व्हिसिंग न झाल्याने सदरची रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाण्याच्या टाकीजवळ चालू आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासन किती जागरुक आहे हे दिसून येते आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेचे सुमारे १५० कोटींचे वार्षिक बजेट आहे. आणि अश्या अटीतटीच्या प्रसंगी अत्यावश्यक सेवेचा बोजवारा उडाला आहे. यापुर्वी देखील पालकीचे अत्यावश्यक सेवा देणारे वाहन कधी डिझेल अभावी तर कधी गाडीचे टायर खराब झालेने बंद असतात. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन नेमकी करते काय असा प्रश्न उपस्थित होतो.