आमदार हेमंत ओगले राज्यपालांच्या भेटीला; विस्थापितांचे पुनर्वसन करण्याच्या शासनाला त्वरित सूचना देण्याची केली मागणी


श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात अतिक्रमणाच्या कारवाई खाली संपूर्ण बाजारपेठ प्रशासनाने उध्वस्त केली असून त्यामध्ये विस्थापित झालेल्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याच्या सूचना शासनाला देण्याची विनंती आमदार हेमंत ओगले यांनी  राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन केली आहे. 

       राज्यपाल महोदयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपुरला चहू बाजूने कोंडीत पकडण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यामध्ये सुरुवातीला रेल्वे त्यानंतर नगरपरिषद आणि आता जलसंपदा विभागाने अतिक्रमणाच्या नावाखाली सरसकट नोटीसा दिल्या आहेत. नुसत्याच नोटीसींवर न थांबता गेल्या ४० ते ५० वर्षांपासून व्यवसाय करत असलेल्या छोट्या व्यवसायिकांवर घाला घातला आहे. त्यामध्ये अनेक प्रपंच उघड्यावर आले असून सर्वसामान्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर मध्ये भयावह परिस्थिती झालेली असल्याने नागरिकांचा आता उद्रेक होत आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो की, आपण याबाबत शासनाला त्वरित सूचना देऊन जे विस्थापित झाले असेल त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याच्या सूचना द्याव्यात. पुनर्वसन करण्यासाठी श्रीरामपूर शहरात व लगतच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती महामंडळ, एस टी महामंडळ, म्हाडा, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या नगरपरिषदेच्या हद्दीत शासकीय जागा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभे करता येऊ शकते.
            विस्थापितांचे तातडीने पुनर्वसन करणे आवश्यक आहे पुनर्वसन केले तरच श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा उभी राहील याबाबत आम्ही राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार त्याचबरोबर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देखील याबाबत लक्ष वेधले आहे. 
         या संवेदनशील विषयांमध्ये आपण तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असून शासनाला संबंधित विस्थापितांचे तातडीने पुनर्वसन करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी राज्यपाल महोदय यांच्याकडे केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post