श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात गेल्या दहा दिवसांपासून चालू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेक छोटे-मोठे व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर आले असून, त्यांचे तातडीने शासकीय जागेवर पुनर्वसन करा, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई केल्याने अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या ४० ते ५० वर्षापासून ज्या ठिकाणी व्यवसाय करत होते त्याच ठिकाणावर हातोडा पडल्याने व्यवसाय धारकांवर दैनंदिन रोजी रोटी, मुलांचे शिक्षण व वडीलधाऱ्यांचे आजारपण यांसारखे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आले आहे.
श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासकीय जागा उपलब्ध असून त्यामध्ये म्हाडा, शेती महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस टी महामंडळ, जलसंपदा विभाग तसेच नगरपरिषदेच्या अनेक जागेवर विस्थापितांचे पुनर्वसन करता येणे शक्य होईल. त्याकरिता शासनाने सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. या कामी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून येणाऱ्या अर्थसंकल्पात सदरची आर्थिक तरतूद करण्यात यावी जेणेकरून पुनर्वसन करणे सोयीचे होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, याबाबत आपण निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे. दरम्यान, अतिक्रमण कारवाई चालू झाल्यापासून आमदार ओगले यांनी जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आठ दिवसात दोनदा समक्ष भेट घेऊन तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील श्रीरामपूरची झालेली भयावह परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.