अहमदनगर : नेवासे, संगमनेर, जामखेड, राहुरीमधून एकूण ४९ व्यक्ती घेतल्या ताब्यात ; यात काही परदेशी व्यक्तींचा समावेश

आज एकूण २३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त. सर्व अहवाल निगेटिव्ह.

साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 मार्च 2020
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने त्यांच्या संपर्कातील ०९ व्यक्तीचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्या ०९ अहवालासह एकूण २३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान प्रशासनाने आता जिल्ह्यातील विविध भागातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून नेवासे, संगमनेर, राहुरी, जामखेड आदी ठिकाणाहून ४९ जणांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे घशातील स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. या ४९ व्यक्तींमध्ये नेवासेमधून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीमध्ये काही परदेशी व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकरी राहुल द्विवेदी यांनी दिली.


आतापर्यंत एकूण ३२५ जणांचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २६२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल १४ दिवसानंतर निगेटीव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. अजुन ५२ स्त्राव चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे.  
        डॉ. प्रदीप मुरंबिकर, जिल्हा शल्य चिकित्सक 

            जिल्हा आरोग्य यंत्रणेने  या सर्वांना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे. काल जिल्ह्यात आणखी  ०२ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या होत्या. त्यानंतर त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची तसेच परदेशातून आलेल्या  काही व्यक्ती अजून जिल्ह्यात आहेत का ? याची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. पोलिस आणि आरोग्य यंत्रणेने याबाबत काही ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली असता काल बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जामखेड, संगमनेर आणि राहुरी येथील काहीजण आल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नेवासे येथून ११ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. यात काही परदेशातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्व ४९ जणांचे स्त्राव नमुने आता चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post