साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मार्च 2020
मुंबई : कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. (coronavirus) कोरोनाचे संकट परतवून लावायचे आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे बाजारात गर्दी करु नका, नियमांचे पालन करा. योग्य सुरक्षित अंतर ठेवा. (Social Distance) मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
ते म्हणालेत, राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय स्टोअर्स, किराणा दुकान आणि इतर जीवनावश्यक सेवा खुल्या ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने चोवीस तास दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली. दुकानात गर्दी झाल्याने सरकारने यामुळे ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी दुकाने २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला मुख्य सचिव, महापालिका आयुक्त आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. तसेच या बैठकीत सामाजिक अंतर देखील राखले गेले. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली गेली.
सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना चोवीस तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
दरम्यान, लॉकडाऊन ही संकल्पना लोकांना माहिती नव्हती. त्यामुळे त्यांचा भीतीमुळे गोंधळ झाला. म्हणून लोकांनी भाजीपाला आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे शासनाने काही नियम कडक केले आहोत. भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तू आहे; त्याची यंत्रणा सरकारने उभी केली आहे. पहिल्या दोन दिवसात संभ्रम निर्माण झाला. ग्राहकाने घबराहटीने गर्दी केली. आता सगळे सुरळीत होईल, असा विश्वास सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.