प्रधानमंत्री किसान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम



प्रधानमंत्री किसान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम


अहमदनगर | साईकिरण टाइम्स ब्युरो |
अहमदनगर केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरू असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत अहमदनगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्‍हयामध्‍ये 6 लाख 9 हजार 741 शेतकरी पीएम किसान योजने अंतर्गत लाभार्थी असून वेगवेगळया  वित्‍तीय संस्‍था व बँकाकडून यापैकी 3 लाख 51 हजार 714 लाभार्थी  शेतक-यांना  पिककर्ज पुरवठा करण्‍यात आला आहे.  उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यंत्रणांना दिले आहेत. ज्‍या  पीएम किसान अंतर्गत लाभार्थी  शेतक-यांनी अद्याप कोणत्‍याही  वित्‍तीय संस्‍था व बँकाकडून  पिक कर्ज घेतलेले नाही अशा शेतक-यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोणत्‍याही वित्‍तीय संस्‍था तसेच बँकाकडून  पिक कर्ज न घेतलेले 2 लाख 58 हजार 27 पीएम किसान योजनेचे लाभार्थी  शेतकरी जिल्‍हयामध्‍ये शिल्‍लक आहेत.  या शेतक-यांना बँकिंग क्षेत्रापासून  पिककर्ज  उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी  विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक शीलकुमार जगताप तसेच कृषी अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून संबंधितांना विशेष मोहिमेचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व बँक शाखांना यासंदर्भात कळविण्यात यावे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही,  अशा पद्धतीने कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश दिले.

 या शेतक-यांना  सुटसुटित रित्‍या अर्ज करता यावा यासाठी  आयबीए संस्‍थेकडून  एक पानी अर्जाचा नमुना सर्व बॅकांना उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेला आहे. लाभर्थी शेतक-यांनी  या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसलेबाबतचे घोषणपत्र  घेऊन  ज्‍या बॅकेतून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे, तेथे संपर्क साधावा. कोणत्‍याही बँक अथवा वित्‍तीय संस्‍था  येथे पिक कर्ज  नसणा-या पीएम किसान  लाभार्थी  शेतक-यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च हा बँकाकडून माफ करण्‍यात येणार आहे.  परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह  प्राप्‍त झाल्यापासून 15 दिवसामध्‍ये  शेतक-यांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजने अंतर्गत  पिक कर्ज उपलबध करुन देण्यात येणार आहे.  

सर्व तलाठी , ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पावतळीवर यासाठी विशेष मोहिम राबवून आपल्‍या कार्यक्षेत्रातील  बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे अशा सूचना देण्‍यात आल्‍या असल्याचे जिल्हाधिकारी श्री द्विवेदी यांनी सांगितले.      

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post