श्रीरामपुरातील नागरी समस्यांवर त्वरित उपाययोजना करा ; शहरातील प्रश्नांवर 'मनसे' आक्रमक : नगराध्यक्ष करण ससाणे, 'सीओं'ना निवेदन



श्रीरामपूर : शहरवासियांच्या नागरी समस्या सोडवून  नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, उद्यान, शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याची मागणी 'मनसे'च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष करण ससाणे व मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की, शहरातील बाजारतळालगतच्या उद्यानात नागरिकांसाठी व्यायाम साहित्य बसवून लहान मुलांना खेळण्याचे साहित्य बसवावे. संपूर्ण उद्यानाचे नव्याने सुशोभीकरण करावे. शहरातील सर्व गटारी, नाल्यांची रोजच्यारोज साफसफाई करावी. शहरात  सार्वजनिक शौचालय उभारावित, जुन्या सर्व स्वच्छतागृहांची दुरुस्ती करावी. शहरातील रस्ते नव्याने करून खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करावे. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करावी. डास निर्मूलनासाठी संपूर्ण शहरात प्रत्येक आठवड्यात एक दिवस फवारणी करावी. तालुका पोलीस स्टेशन समोरील संत गाडगे महाराज उद्यानातील व्यायामाचे साहित्य त्वरित दुरुस्त करावे. शहरातील प्रत्येक वार्डामध्ये बजरंग व्यायाम शाळेप्रमाणे व्यायाम शाळा सुरू करण्यात यावी. शहरातील प्रत्येक वार्डातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट बसवून ज्या भागात स्ट्रीट लाईट नाही त्या भागात स्टेट लाईट बसवावे.

शहरात गेल्यावर्षभरामध्ये ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम व इतर नगरपालिका अंतर्गत झालेले कामे निकृष्ट दर्जाचे केले अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. शहरात ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने नव्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या इमारत मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच ज्यांनी पार्किंगची जागा दाखवून इमारत बांधकाम परवानगी घेतली आहे व प्रत्यक्षात पार्किंगची व्यवस्था केली नाही, अशा इमारत बांधकाम मालकावर कारवाई करावी.

नगरपरिषद अंतर्गत असलेल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यात याव्यात. सर्व शाळा दुरुस्त करून सीसीटीव्ही बसवण्यात यावी.  शहरांमध्ये ठिकठिकाणी भाजी विक्रेते रोडच्या कडेला बसून बाजी विक्री करतात त्यामुळे ट्रॅफिकला अडचण निर्माण होते त्यामुळे सर्व बाजी विक्रेत्यांना नेहरू भाजी मंडई मध्ये बसविण्याची सक्त ताकीद देण्यात यावी, इतर ठिकाणी बसल्यास त्यांच्यावर दंड करण्यात यावे. अशा शहरातील प्रमुख समस्यांची नवनियुक्त नगराध्यक्ष यांच्यासमोर निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली. या सर्व मागण्यांच्या श्रीरामपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या असल्याने यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी,अन्यथा न  महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने नगरपरिषद कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शराध्यक्ष सतीश कुदळे, नितीन जाधव रोजगार सेना तालुकाध्यक्ष, मनसे श्रीरामपूर तालुका प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल ठोंबरे,आकाश साबळे  तालुका संघटक,मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष अरमान शेख, निलेश सोनवणे शहर संघटक, शहर चिटणीस मच्छिंद्र हिंगमिरे,आर्यन शिंदे मनसे शहर उपाध्यक्ष, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, रवी शिंदे,आदी पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post