![]() |
बेलापूर : राजवाडा येथील जलशुद्धीकरण यंत्रणा बंद असल्यामुळे ग्रामस्थ शुद्ध पाण्यापासून वंचित राहत आहेत. |
'अनुसूचित जाती उपयोजना व नविन्यापूर्ण योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील गावांमध्ये शेडसह जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे' , या योजनेअंतर्गत ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने लाखों रुपये खर्चून ठिकाठिकाणी शेडसह जलशुद्धीकरण यंत्रणा बसविल्या. याच योजनेतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील खटकळी गावठाण, राजवाडा, गायकवाड वस्ती या ठिकाणी प्रत्येकी 5 लाख 39 हजार ,897 रुपये याप्रमाणे तीनही ठिकाणी तब्बल 16 लाख 19 हजार 691 रुपये रुपये खर्चून बसविलेली जलशुद्धीकरण यंत्रणा अक्षरशः धुळखात पडून आहे, बंद आहे. ही जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वितच केली नसताना देयके अदा केलीच कसकाय? असा सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित केला आहे.
जलशुद्धीकरण यंत्रणेवर लाखों रुपये खर्च करून बेलापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी शासनासह जनतेची घोर फसवणूक केली आहे. जलशुद्धीकरण यंत्रणा सुरूच झालेली नसताना देयके अदा केलीच कसकाय..? असा सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित केला. एवढा खर्च करूनही जनतेला त्याचा लाभ मिळत नसेल तर उपयोग काय.? या यंत्रणेचा दोषनिवारण कालावधी 1 वर्षाचा आहे. दरम्यानच्या काळात जलशुद्धीकरण यंत्रनेच्या देखभाल-दुरुस्तीवर खर्च करण्यात आला आहे का? देखभाल दुरुस्तीचे बिले काढण्यात आली आहे का? पाण्याच्या शुद्धतेची वेळोवेळी तपासणी केली का? असे अनेक सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित करून या सर्व प्रकाराची चौकशी, तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्याचे काम बेलापुरात सुरु आहे. मोठा गाजावाजा करत गावातील कामांचे उदघाटणे केली जातात. विकास कामे केल्याचा बोभाटा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच. विकास कामाच्या माध्यमातून केवळ अधिकारी, ठेकेदार पोसण्याचे काम सुरु आहे. अत्यंत निकृष्ट कामे करून शासनासह जनतेची घोर फसवणूक केली जात आहे. ठेकेदारमागे कोणाचा मुखवटा आहे, हे जनतेसमोर येत आहे.
जलशुद्धीकरण यंत्रणेचे पाण्याचे पाईप तुटलेले, पाण्याचे जार अस्तव्यस्त पडलेले दिसले. जलशुद्धीकरण यंत्रावर धुळीचे थर लटकलेले. आजूबाजूला कचरा, अस्वच्छता होती.
राजेश बोरुडे यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा श्रीरामपूर उपविभागाचे उप अभियंता रविंद्र पिसे यांना जलशुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याबाबत विचारणा केली व त्याबाबतचे पुरावे, छायाचित्रे दाखविली. दरम्यान, उप अभियंता पिसे यांनी, जलशुद्धीकरण यंत्रनेची देखभाल-दुरुस्ती, चालू ठेवण्याची जबाबदारी आमची नाही, ग्रामपंचायतीची असल्याचे सांगितले.
जलशुद्धीकरण यंत्रणेची सखोल चौकशी करून यंत्रणा बंद ठेऊन शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, असे तक्रारीत राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे. दोषींवर लवकरात-लवकर कारवाई केली नाही तर प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे, असे समजून श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, उप अभियंता यांना घेराव घालण्यात येईल. काळे फासण्यात येईल. ठिय्या, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे. तक्रारीच्या प्रती वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या असून पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे बोरुडे यांनी म्हंटले आहे.
![]() |