साईकिरण टाइम्स | १९ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | निवडणूका लोकशाहीचा मुलभूत पाया आहे. ग्रामसभाही लोकशाहीचाच सुसंस्कृत पर्याय आहे. परंतु, निवडणूकांचे आजचे स्वरुप स्पर्धात्मक न राहता युध्दजन्य बनले आहे. त्यामुळे, ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध व्हाव्यात, असे मत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कानडे यांनी म्हंटले आहे कि, अनेक पक्ष व गट ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आपापले वर्चस्व गावावर रहावे म्हणून काही कारभा-यांना आपलेसे करुन स्वतःच्या गटाची पार्टी तयार करुन लोकांना झुंजवतात. एकाच गावचे गावकरी अनेक गटातटामध्ये दुंभगले जातात. निवडून येण्याच्या इर्षेने एकमेकांना शाब्दीक जखमा होतात. काही हाणामारीचे प्रसंगही उद्भवतात. हे सर्व टाळावयाचे असल्यास ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीच्या सदस्यांची नियमानुसार बिनविरोध निवड केल्यास गावातील प्रेम व सौहार्द टिकू शकते व त्याचा परिणाम गाव शिवारासाठी शासनाच्या विविध योजना एकजुटीने राबविण्यासाठी मदत होते. गावाचा झपाटयाने विकास होतो. हिवरेबाजार सारखी उदाहरणे आपल्याच जिल्हातील आहेत. म्हणूनच मतदार संघातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात. अशा समंजस गावांसाठी विकास कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार लहू कानडे यांनी म्हंटले आहे.