साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑक्टोबर 2020
भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी सुदृढ नवीन पिढी घडविणे गरजेचे आहे. ती जबाबदारी पालकांच्या मदतीने अंगणवाडी सेविका करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केले.
प्रभाग क्र.१६ मध्ये नव्याने सुरू झालेल्या अंगणवाडीमध्ये पोषण माह सांगता समारोप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना स्नेहल खोरे म्हणाल्या की, शहरातील वाढती लोकवस्ती लक्षात घेता अंगणवाड्या वाढविणे गरजेचे होते. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात अंगणवाडी सुरू व्हावी म्हणून मागणी केली जात होती. मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी केलेल्या पाठपुराव्याने ही अंगणवाडी सुरू करण्यात आल्याने पालक व पाल्यांची गैरसोय दूर झाल्याचे खोरे म्हणाल्या. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून भारत देशाची ताकद असलेली नवीन पिढी सुदृढ होण्यास मदत होणार आहे. शासकीय सुविधांचा पाल्यांना लाभ देण्यासाठी नागरिकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी अंगणवाडीत करावी असे आवाहन खोरे यांनी केले.
यावेळी अंगणवाडी सेविका लता गायकवाड, अलिमुन शेख, मोहिनी कोठकर, हिरा नेहे, जयश्री बिंगले, नीलिमा भोगे, वंदना शिंदे, निर्मला वानखेडे, अलका बागुल, रंजना लांडे यांच्यासह प्रभागातील महिला भगिनी उपस्थित होत्या.