केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीचा काँग्रेसकडून निषेध
साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | सध्या सत्तेवर असलेले केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीच्या धोरणा विरोधात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी ससाणे बोलत होते.
ससाणे पुढे म्हणाले की, जगभरात लॉकडाऊन असतांना शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले.कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठा खर्च करुन कांदा लागवड केलेली आहे.
केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी जाहिर करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला असल्याचे म्हटले.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याची घोषणा केली होती. परंतू तीन महिन्यांतच घुमजाव करुन आपला निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचे म्हटले आहे.
तालुका काँग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तत्काळ मागे घेऊन सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात आमदार लहू कानडे व युवा नेते करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
प्रताधिकार अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनावर उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्यध्यक्ष सचिन गुजर, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा कार्यकारणीचे सदस्य बाबासाहेब कोळसे, सतिश बोर्डे, सुभाष तोरणे, रमेश आव्हाड, दिपक कदम जालिंदर बेहळे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.