साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 जुलै 2020
बेलापूर (प्रतिनिधी) बेलापुरातील एक युवक कोरोना पॉझीटीव्ह निघाल्यानंतर त्याच्या संपर्कातील सुमारे 14 लोकांना स्त्राव तपासणीसाठी श्रीरामपुरला नेले. मात्र, त्यांना तेथे रात्रभर ठेऊन स्त्राव न घेताच परत पाठवले. त्यांना काही दिवस होम क्वारंटाईन करणे गरजेचे होते. मात्र, आरोग्य विभागाने तसे काहीच केले नाही. त्यामुळे हे लोक बिनधास्तपणे गावभर फिरत आहेत. अशाच प्रकारामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा घणाघात बेलापुरात अनेक नागरीकांनी केला आहे.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन बेलापूरगावातील सजग नागरीकांनी कोरोना समितीसमवेत शुक्रवारी बैठक घेतली व अनेक गंभीर त्रुटींचा ऊहापोह केला.
या बैठकीला जि.प.सदस्य शरद नवले,उपसरपंच रविंद्र खटोड,सुनिल मुथा,सुधिर नवले,मारुती राशीनकर,देविदास देसाई,नवनाथ कुताळ दिलीप दायमा अभिषेक खंडागळे,सुधाकर खंडागळे,भरत साळुंके,अजय डाकले,विष्णूपंत डावरे,चंद्रकांत नाईक,पोलीस नाईक.रामेश्वर ढोकणे,साईनाथ राशीनकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मोरे,डॉ.शैलेश पवार,कामगार तलाठी कैलास खाडे,पोलीस पाटील अशोक प्रधान,अशोक पवार,विजय शेलार,अशोक गवते,प्रफुल्ल डावरे प्रसाद खरात सुहास शेलार अशोक शेलार सचिन वाघ ,दिपक क्षत्रीय, आदींसह अनेक मान्यवर उपस्थीत होते.
दोन दिवसांपुर्वी बेलापूरातील एक युवक कोरोना पॉझीटीव्ह सापडला होता. त्याच्या संपर्कातील सुमारे 14 लोकांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी व कोरोना समीतीच्या सदस्यांनी तपासणीसाठी कोरोना केअर सेंटरला पाठवले होते. मात्र त्यांचे स्त्राव न घेताच परत पाठवण्यात आले.
वास्तविक त्यांच्या हातावर होम क्वारांटीनचा शिक्का मारुन त्यांना क्वारांटीन करणे गरजेचे होते. तसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला व कोरोना समीतीला कळवायला पाहीजे होते.मात्र तसे न झाल्यामुळे ते लोक बिनधास्तपणे गावभर फिरत आहेत. त्यामुळे इतर ग्रामस्थ चिंता व्यक्त करीत आहेत. असाच प्रकार यापुर्वीही घडला होता. एका युवकाचा स्त्राव घेतल्यानंतर त्याचा तब्बल बारा दिवसांनी अहवाल पॉझीटीव्ह आला होता. तोपर्यंत तोही सर्वत्र फिरला. त्यालाही अहवाल येईपर्यंत क्वारांटीन करणे गरजेचे होते.अशा गंभीर त्रुटी आरोग्य विभागाकडून राहत असल्याने त्या कोरोनाला पोषक ठरु शकतात अशी चिंता नागरीक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, यापुढे रुग्ण सापडला तर त्याच्या संपर्कातील इतर लोक स्त्राव तपासणीसाठी नेले जातील. त्यांचे स्त्राव घेतले किंवा घेण्याची गरज पडली नाही तरीही त्यांना काही दिवस होम क्वारांटाईन करावे. तसा त्यांच्या हातावर शिक्का मारावा. शिवाय त्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र,कोरोना समीती पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीला कळवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे.तसे पत्रही तालुका आरोग्य अधिकार्यांना देण्याचे सर्वानुमते ठरले.