जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया कर्जत तालुक्यात प्रगणक प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांची


अहिल्यानगर, दि. २४ :- जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक प्रगणकाने आपली जबाबदारी अचूक व प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.

राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात प्रगणकांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, नागरिकांशी संवाद साधताना नम्रता, विश्वासार्हता राखावी. प्रत्येक घरातील माहिती अचूकपणे नोंदवावी. जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे. समन्वय, सातत्य, शिस्त यांना प्राधान्य देऊन काम वेळेत पूर्ण करावे.

कर्जत तालुक्यात घरांची, कुटुंबांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी सुमारे ६९ पर्यवेक्षक, ३५८ प्रगणकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जात आहे. दि. २३ एप्रिल २०२६ ते ०८ मे २०२६ या कालावधीत चार टप्प्यांत प्रशिक्षण आयोजित केले आहे. प्रत्येक टप्प्यात तीन दिवस सखोल मार्गदर्शन दिले जात आहे.

प्रशिक्षणात तांत्रिक बाबी, अर्ज भरण्याची पद्धत, माहिती संकलनातील अचूकता याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. यावेळी संबंधित अधिकारी, प्रशिक्षणार्थी प्रगणक उपस्थित होते.



Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post