श्रीरामपुरात डीजे-ढोल-ताशाला फाटा ; समाजाला प्रेरणादायी उपक्रम : भव्य रक्तदान, गरिबांसाठी रक्त पिशव्याही राखीव


श्रीरामपूर
: आज ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र निमित्ताने कर्मवीर चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कर्मवीर चौक मित्र मंडळ व अल वारीस युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात तब्बल १५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.



     या रक्तदान शिबिरात युवक वर्गाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत रक्तदान करत सामाजिक भान जपले. जोंधळे ब्लड बँक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण व्यवस्थापन हाताळले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आले.

                  तसेच या रक्तदान शिबिरात जमा झालेल्या रक्तापैकी ५० पिशव्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही एक महत्त्वपूर्ण बाब असून, गरजू लोकांपर्यंत नि:स्वार्थ मदत पोहोचवण्याचा आमचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

       सध्या काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाच्या नावाखाली केवळ डीजे, ढोल-ताशा, आणि लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. त्या तुलनेत, आजचा हा कार्यक्रम एक सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी उदाहरण ठरला. आयोजकांनी गरजूंना मदत करण्यासाठी खऱ्या अर्थाने पैशाचे व वेळेचे मूल्य दाखवून दिले.

     या उपक्रमात विविध धर्म,जाती-पंथातील लोकांनी एकत्र येत रक्तदान केले. हा शांतीचा व एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम ठरला. “रक्त कोणाचेही नसते, ते फक्त जीवन वाचवते”, ही भावना लोकांच्या कृतीतून उमटत होती. या कार्यक्रमाद्वारे कर्मवीर चौक मित्र मंडळ आणि अल वारीस युथ फाऊंडेशन ने हा कार्यक्रम म्हणजे केवळ धार्मिक उत्सव न ठरता, समाजाच्या आरोग्यासाठी दिलेलं एक योगदान आहे असा संदेश दिला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post