जिल्हा परिषद शाळेच्या भिंती बोलू लागल्या..! गुणवत्ता वाढीसाठी 'मिशन आपुलकी' उपक्रम ; नायगावच्या शाळेचे होतेय कौतुक


श्रीरामपूर : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने या द्विशिक्षकी शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या प्रेरणेतून मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभागातून आकर्षक बोलक्या भिंती व शालेय इमारत रंगरंगोटी उपक्रम साकारला आहे.

 या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे, संजीवन दिवे, केंद्रप्रमुख राजू इनामदार यांनी कौतुक केले आहे. प्रथम भिंतीवर प्रायमर रंग देऊन त्यावर आकर्षक स्प्रे पेंटिंग करून आकर्षक चित्रे व त्यासंबंधीची माहिती यांचे रंगकाम करण्यात आले आहे. लहान मुले जिथे शिक्षण घेतात त्या ठिकाणी  सभोवतालच्या वातावरणातून त्यांच्यावर संस्कार होतात. अभ्यासाशिवाय इतर अनेक गोष्टींमधून ते सतत काहीतरी शिकत असतात.बोलक्या भिंती व शालेय रांगकामासाठी मिशन आपुलकी अंतर्गत ५५ हजार रुपयांच्या निधीतून हा उपक्रम साकारला आहे. 

या उपक्रमात प्रवेशद्वारापासून वर्गखोल्यांच्या बाहेरील भिंती, वॉल कंपाऊंड, पाण्याची टाकी, किचनशेड, दरवाजे, खिडक्या, स्टेज, पडवीतील सिमेंटचे पिलर यावर आकर्षक चित्रे काढून चित्रांसंबधी माहितीचे रंगकाम करून शाळेच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही वाढ होण्याच्या दृष्टीने बोलक्या भिंती उपक्रम फायदेशीर ठरला आहे.

आकर्षक थीमचे रेखाटन करून मराठी व इंग्रजी मुळाक्षरे व संख्या,मराठी - इंग्रजी महिने व वार,प्राणी व पक्षी,फळे व फुले,भाजीपाला,भौमितिक आकार,कीटक,रंग यांची चित्रे व इंग्रजीत नावे,इंग्रजीतील कृतींची चित्रे व नावे,स्वरचिन्हानुसार इंग्रजी शब्द,वर्गसंख्या,शरीराचे अवयव,रस्ते वाहतुकीचे नियम,जोडाक्षर युक्त शब्द, राज्य व देश यांची माहिती,राष्ट्रीय मूल्ये,चांगल्या सवयी,स्वच्छतेचे संदेश,वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूस आकर्षक चित्रांद्वारे धूम्रपान निषेध,मुलगी वाचवा- मुलगी शिकवा, स्वच्छता,रक्तदान - श्रेष्ठदान,वृक्षारोपण असे सामाजिक संदेश,योग,विज्ञान संदेश,आकर्षक वार्ताफलक आदि बाबींमुळे शाळा रंगीत झाली असून शाळेच्या सौंदर्यात भर पडून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. बोलक्या भिंतीमुळे मुलांचा अभ्यासही सहज होत आहे.शालेय वातावरण अधिक प्रसन्न झाले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांनी बोलक्या भिंती उपक्रम राबविताना विद्यार्थ्याची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांच्या ज्ञानात भर पडावी, अशी रचना केली आहे. यासाठी बोलक्या भिंती उपक्रम राबविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक,पालक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी जुने नायगाव या शाळेतील शिक्षकांनी बोलक्या भिंती हा उपक्रम उत्कृष्ट राबविला आहे.विद्यार्थ्यांचा हसत खेळत,सहज अभ्यास होत आहे.

      - साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी, श्रीरामपूर, पंचायत समिती 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post