साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 जुलै 2020
श्रीरामपूर | महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानावर हल्ला करून तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी व राजगृहाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर, दत्तनगर सरपंच आरपीआय तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे यांनी केली.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हंटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह हे आंबेडकरी जनतेचे तीर्थस्थान असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी घर बांधले होते. राजगृहाला भेट देण्यासाठी जगभरातील आंबेडकर प्रेमी अनुयायी तेथे रोज येत असतात. आंबेडकरी जनतेसाठी हे महत्त्वाचे ठिकाण मानले जातात. काही माथेफिरूंनी राजगृह वरील सीसीटीव्ही कॅमेरेची तोडफोड केली. दगडफेक केली. घराबाहेरील बगीच्याचे नुकसान केले आहे. या घटनांमुळे आमच्या भावना दुखावल्या आहे. सदरचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व लाजिरवाणा आहे. त्यामुळे, सरकारने लवकर आरोपी अटक करून कठोर कारवाई करावी व राजगृहाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुनील संसारे, सुरेश शिवलकर, हिरामण जाधव, रामदास रेने, कडूबाई पवार, अजय शिंदे, अमोल काळे, बाळासाहेब अमोलिक, सचिन खांडरे आदी उपस्थित होते.