साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 एप्रिल 2020
श्रीरामपूर | संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन चालू आहे. लोकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांचे कामधंदे बंद झाले आहेत. पैसा राहिला नाही. हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 3 महिने कोणती बँक, फायनान्स कंपनी सर्वसामान्य नागरिकांना कर्जाच्या हफ्त्यासाठी त्रस्त करणार नाही, असे जाहीर केले असले तरी ; तीन महिन्यानंतर ते थकीत हफ्ते व्याजासहित भरायचे आहे. 3 महिन्यानंतर कामधंदे चालू होऊन पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यात सर्वसामान्य व्यक्ती कर्ज फेडले की घर चालवेल.?? त्यामुळे सर्वसामान्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी अखिल भारतीय सेनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरकार शेतकऱ्यांचे तसेच मोठ्या कंपन्यांची कर्ज माफ करू शकते तर सर्वसामान्यांचे कर्ज का माफ करू शकत नाही? कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे लोकडाऊन किती दिवस वाढवावे लागेल हे निश्चित नाही ; कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर लोकांना कामधंदे करून जनजीवन पूर्ववत करण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे.
त्यात नंतर घरखर्च चालवायचा का कर्जाचे हप्ते फेडायचे हा नागरिकांसमोर मोठा प्रश्न आहे. दैनंदिन जनजीवन पूर्ववत करण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वसामान्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी अखिल भारतीय सेनेचे तालुकाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी केली आहे.